मोहोळ : शेतीसाठी मातीचे आरोग्य महत्वाचं आहे, ते आरोग्य सुधारण्यासाठी करायच्या उपाययोजना याबद्दल शासन वेळोवेळी माहिती देते, ती आम्ही आपल्या पर्यंत घेऊन येतो. नैसर्गिक शेती शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे, असं प्रतिपादन मृदशास्त्रज्ञ श्रीमती काजल जाधव-म्हात्रे यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ विकसित कृषी संकल्प अंतर्गत पंढरपूर तालुक्यामधील वाखरी येथे मंगळवारी, १० जून रोजी आयोजित कार्यक्रमात मृदशास्त्रज्ञ श्रीमती काजल जाधव-म्हात्रे बोलत होत्या.
कृषि विज्ञान केंद्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व सेंद्रिय निविष्ठा जसे की, बीजामृत, जीवामृत, अमृत पाणी, अमिल अर्क अशा प्रकारच्या निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते, याबद्दलही मृदशास्त्रज्ञ श्रीमती काजल जाधव-म्हात्रे यांनी सविस्तर माहिती दिली.
त्याचबरोबर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय तज्ञ दिनेश क्षीरसागर यांनी अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी, आवश्यक यंत्रसामुग्री, पॅकेजिंग तंत्रज्ञान, प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व सहाय्यभूत शासकीय योजना बाबत सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. पंकज मडावी यांनी खरीप पिकांमधील तूर, मका, उडीद या पिकांमधील कीड व रोग व्यवस्थापनामधील ठळक मुद्दे स्पष्ट केले. डॉ. शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकांमधील मर व तेला रोग व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली.
डॉ. परशुराम पत्रोटी यांनी आहारामधील भरड धान्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करताना, शेतकऱ्यांना राळा, भगर या पिकाचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयोग ठाकरे, महेश बाबर, किरण चव्हाण, वैभव माने यांचे सहकार्य लाभले.