कृषी संकल्प अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

shivrajya patra

सोलापूर : कृषि विज्ञान केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सहा तालुक्यांमध्ये आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार व खरीप हंगामपूर्व नियोजनाच्या उद्देशाने, २९ मे ते १२ जून या कालावधीत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. हे अभियान महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, कृषी विभाग महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर आणि राष्ट्रीय भरडधान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविले जात आहे.”या अभियानाच्या पंधराव्या दिवशी मोहोळ तालुक्यातील डोकबाभुळगाव येथे आयोजन करण्यात आले. 

या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना डॉ. गणेश पवार (ऊस कृषी विद्यावेत्ता) यांनी ऊस लागवडीचे अर्थशास्त्र, बेणे प्रक्रिया व बेणे निवड, सरीतील अंतर, तण व्यवस्थापन, जमीनीचे आरोग्याचे व अंतर पिकाचे महत्त्व या बाबीच्या माध्यमातून सखोल असे मार्गदर्शन केले. 

त्यानंतर डॉ. परशुराम पात्रोटी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांनी भरड धान्याचे उत्पादनातून शाश्वत शेती व आरोग्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले.

डॉ. शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकातील तेल्या रोग व डाळिंबामध्ये येणारा मर रोग याबद्दल मार्गदर्शन केले. अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय विशेषज्ञ दिनेश क्षिरसागर यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. 

पीक संरक्षण विषयाचे विषय विशेषज्ञ डॉ. पंकज मडावी यांनी खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन अशा विविध नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. माती व पाणी परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्रं विषयाचे विषय विशेषज्ञ श्रीमती काजल जाधव म्हात्रे यांनी मार्गदर्शन दिली. 

मंडळ कृषी अधिकारी सुहास कौलगे यांनी कृषि विभागाच्या योजना याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली.

याप्रसंगी डोकबाभुळगावचे सरपंच श्रीमती रुक्मिणी पांढरे, उप कृषि अधिकारी सुनील चोपडे, सहायक कृषि अधिकारी निखिल देशमुख, महिला आर्थिक विकास महामंडळ च्या श्रीमती आठवले आणि चौधरी मॅडम कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू मुळे, आठवले मॅडम, सुयोग ठाकरे आदींचं सहकार्य लाभले.


To Top