सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून आषाढी वारीच्या यशस्वीतेसाठी काटेकोर नियोजन
सोलापूर : आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 6 जुलै रोजी होत असून 26 जून ते 10 जुलै 2025 हा संपूर्ण यात्रा कालावधी आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्व मानाच्या व अन्य पालख्यांचे त्यांच्या नियोजित तिथीप्रमाणे पंढरपूरकडे प्रयाण होणार आहे. संपूर्ण वारी कालावधीत पालख्या, दिंड्या त्यांच्या समवेत असणारे वारकरी, भाविक यांना पालखी मार्ग, पालखी तळ, पालखी विसावा ठिकाण, रिंगण व पंढरपूर शहरात सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सोयी सुविधा संबंधित प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत काटेकोरपणे उपलब्ध करून द्याव्यात. त्यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, व ही आषाढी वारी निर्विघ्नपणे पार पाडावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या नियोजनाच्या पूर्वतयारीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथून घेतला. याप्रसंगी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी महसूल संतोषकुमार देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांच्यासह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले की, आषाढी वारीमध्ये सर्व मानांच्या पालख्या व अन्य पालख्या प्रमुख व विश्वस्त यांच्या सूचनेप्रमाणे पालखी मार्ग पालखी मुक्काम ठिकाण विसावा ठिकाणी व रिंगण व पंढरपूर शहरात वाखरी येथे आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
यावर्षी पाऊस लवकर सुरू झालेला असून पावसाचे प्रमाण अधिक असू शकते, त्या दृष्टीने पालखी मार्गावर, तळावर आवश्यक त्या ठिकाणी जलावरोधक मंडप उत्कृष्ट दर्जाचे टाकावेत. शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली करावी. पालखी सोहळा व वारकऱ्यांना या कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, या दृष्टीने सर्वांनी दिलेली जबाबदारी अत्यंत नियोजनबद्धरित्या पार पाडावी. या सोयी सुविधा निर्माण करताना आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
पुणे, सातारा व सोलापूर जिल्हाधिकारी यांनी पालखी मार्गावर त्यांच्या त्यांच्या हद्दीत पालखी मुक्कामी ठिकाणी विसावा ठिकाणी जनरेटर ची व्यवस्था ठेवावी. कारण पाऊस लवकर सुरू झालेला आहे, तसेच यावर्षी पाऊस अधिक प्रमाणात येण्याची शक्यता गृहीत धरून पालखी सोहळा प्रमुख व सोबतच्या दिंड्यांमध्ये येणारे वारकरी यांना पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वीज नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने तेवढ्या प्रमाणात जनरेटर व्यवस्था करून ठेवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले. यासाठी जिल्हा परिषदेचा सेसमधील निधी वापरावा. जर हा निधी नसेल तर जिल्हा नियोजन समिती मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पोलीस विभागाने देहू व आळंदी येथून पालख्या निघाल्यानंतर त्यांच्यासमवेत असलेल्या शौचालय वाहने, पाण्याचे टँकर तसेच अन्य सुविधा पुरवणाऱ्या लोकांसाठी देहू, आळंदी ते पंढरपूर पर्यंत एकच पोलीस विभागाचा युनिक पास उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून त्या-त्या जिल्ह्याच्या हद्दीत जाताना या लोकांना पर्यायाने वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, असं पवार यांनी सांगून पालखी मार्गावर तसेच संपूर्ण वारी कालावधीत स्वच्छतेला अधिक प्राधान्य देण्याचेही त्यांनी सुचित केले.

यावेळी पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी तसेच सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही वारीच्या अनुषंगाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली.