उत्सव परवानगीसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ऑनलाईन-ऑफलाईन नोंदणीसाठी स्वतंत्र व्यवस्था
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५ करिता मंडळांनी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिली.
' डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५ ' च्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोमवारी,०७ एप्रिल रोजी सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर टी ओ चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, शांतता समिती सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५ चे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती. पोलीस आयुक्त एम. राजकुमार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
या बैठकीची प्रस्तावना श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी करुन बैठक आयोजीत करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. १४ ते २० एप्रिल रोजी दरम्यान कालावधीत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५' साजरी करण्यात येणार आहे. २० एप्रिल रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सूचना देण्यात आल्या.
सोशल मिडीयावरुन काही आक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२५ मंडळांनी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे, याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावं, असं आवाहन यावेळी करण्यात आले.
त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर या सूचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी या कामाची रुपरेषा पाहून समस्या सोडविण्यात येतील, असं पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी म्हटले.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. योग्य तो बंदोबस्त नेमू, असं सांगून बैठकीला आलेल्या उपस्थितांचे आभार मानताना, डॉ. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, अजित बोऱ्हाडे (पोलीस उप आयुक्त-मुख्यालय), श्रीमती डॉ. दिपाली काळे (पोलीस उप आयुक्त-गुन्हे), विजय कबाडे (पोलीस उप आयुक्त-परीमंडळ), राजन माने (सहा पोलीस आयुक्त-गुन्हे शाखा), सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रताप पोमण (विभाग-१), यशवंत गवारी (विभाग-२), सुधिर खिरडकर (वाहतुक शाखा) तसेच सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी श्रीमती अकुलवार, आर टी ओ चे अधिकारी, महावितरण अति. कार्यकारी अभियंता अशिष मेहता, भारत व्हनमाने, अग्निशामक दलाचे दुधाळ व इतर प्रशासकीय अधिकारी व तसेच सर्व पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधु उपस्थित होते.
... चौकट ...
वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत करावी जनजागृती
उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरांपासून मुर्ती/फोटोस धोका होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र्य राखावे, मंडळांकडून जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी, असंही यावेळी सुचित करण्यात आले.
... चौकट ...
नियमांचे पालन झालं नाही, तर होईल कायदेशीर कारवाई :
उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. शासनाने नेमून दिलेल्या सूचना पाळल्या पाहिजेत. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन झाले नाही, तर कायदेशीर कारवाई होईल, असंही पोलीस आयुक्तांनी यावेळी सांगितले.
... चौकट ...
... याची घ्यावी काटेकोर दक्षता !
सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडळांनी महावितरण विभागाकडून अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी, जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होऊन इजा अथवा धोका होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर. टी. ओ. कडून तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेऊ नये. अन्य धर्माच्या भावना दुखावणार नाही, यांची काटेकोर दक्षता घ्यावी. मंडळाने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या मुर्तीसमोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील, याची पुरेपुर काळजी घ्यावी, असंही यावेळी सुचित करण्यात आलं.