पवित्र रमजान महिन्यांमध्ये कुरआन शरीफचे पृथ्वीतलावर अवतरण झालेले असल्याने या महिन्यात जगभरामध्ये सर्वाधिक कुरआन पठण केले जाते. याला तिलावते कुरआन म्हणतात. तसं कुरआन शरीफ हा ग्रंथ दररोज वाचण्यासारखा आहे.
मूळ अरबी भाषेत असलेल्या या ग्रंथाचं नुसतं वाचन न करता त्यातील अर्थ समजून घेऊन त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे.
दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक घटना अनाकलनीय असतात. अचानकपणे काही प्रसंग निर्माण होतात. अशा प्रसंगी नेमका कोणता निर्णय घ्यावा, हे आपल्याला सुचत नाही. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून कुरआन शरीफ मधील अल्लाह तआलाचे आदेश आणि उपदेश आपल्याला मार्गदर्शक ठरत असतात. दररोजच्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांपैकी अनेक प्रश्नांची उकल कुरआन शरीफ मध्ये नमूद केलेली आहे.
त्याचबरोबर हजरत पैगंबर आणि त्यांच्या नंतरच्या सगळ्याच धार्मिक जाणकारांनी माणसाने कसे वागावे ? याबाबत काही अनमोल उपदेश केलेले आहेत.
जसे- जर सदैव आनंदित रहावयाचे असेल तर वेळेवर नमाज अदा करावी. चेहरा तजेलदार राहावा, असे वाटत असेल तर तहज्जुद(मध्यरात्रीनंतर आदा केली जाणारी नमाज)अदा करावी. जर मनाला शांतता हवी असेल तर कुरआनशरीफ ची तिलावत करावी.
आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजे धरावेत. समस्यांची उकल करायची असेल तर अस्तगफार करावा. (असतगफार म्हणजे अल्लाह तआलाची मागितलेली माफी). जर बरकत पाहिजे असेल तर दरुद शरीफ पठण करावे.(दरूद शरीफ म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहो अलैहे व सल्लम यांच्या नावाने केला जाणारा जप) समस्या आणि चिंता मुक्त व्हावयाचे असेल तर लाहौल वला कुव्वता इल्ला बिल्ला या श्लोकाचे पठण करावे.
दुःखांपासून चिंतामुक्त होण्यासाठी दुआ मागावी. नेहमी अल्लाहचे नामस्मरण करावे. प्रेषित हजरत पैगंबरांनी दाखवून दिलेल्या मार्गावर सदैव मार्गक्रमण करावे. आपल्यामुळे कोणाला ही कशाही प्रकारचे दुःख पोहोचणार नाही, याची काळजी घ्यावी. नेहमी खरेच बोलावे. खोटे बोलून आपले पुण्य वाया घालवू नये. गरजू महिला-पुरुष,मुले,मुली यांची नेहमी मदत करावी.विधवा आणि अनाथ यांना नेहमी मदत करावी.
आपण करीत असलेले प्रत्येक कृत्य हे अल्लाहला ज्ञात आहे. मग ते उजेडात करा किंवा अंधारात करा. त्यामुळे सतत अल्लाहची भीती मनात ठेवून जीवन जगावे. कारण या दुनियेत आपण करणार असलेल्या प्रत्येक कार्याचा हिशोब कयामतच्या दिवशी होणार असून आपण केलेल्या कार्याप्रमाणे जमाखर्च होऊन आपल्या जीवनाचं निकाल पत्रक (नाम ए आमाल) प्रत्येकाला प्राप्त होणार आहे.
त्यामुळे मी हे केलं पण कुणाला माहीत नाही, मी ते केलं पण कोणी ही पाहिले नाही.या भ्रमात कोणीही राहू नये.नफरत आणि द्वेष पसरवून कुणाचेही भले झालेले नाही हा या जगाचा इतिहास आहे.याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागावे.तरच जीवनात शांतता नांदते.(क्रमशः)
सलीमखान पठाण-9226408082.