Type Here to Get Search Results !

चंद्रकांत कुलकर्णी, संग्राम गायकवाड आणि सुमती जोशी लोकमंगल राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी

सोलापूर : लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड (सोलापूर),  दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (संभाजी नगर) आणि सुमती जोशी (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी, 9 फ्रेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजून  20 मिनिटांनी  ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या उपस्थितीत  हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली.

रोख 25 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहॆ. लोकमंगलच्या वतीने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे.

संग्राम गायकवाड यांच्या 'मनसमझावन' या कादंबरीला तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्या 'चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे' या आत्मपर लेखनाला तर गोल्पे  विभोर गल्पेर बागान बाणी बसू यांच्या 'बंगाली कथा' संग्रहाचे मराठी अनुवाद करणाऱ्या सुमती जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहॆ.

मराठी भाषा वाङमय संस्थात्मक योगदानाबद्दल आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल कौतिकराव ठाले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. रोख 25 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहॆ.

यावेळी सोलापुरातील सुनिता डागा यांच्या हजार मैलावर तुझे शहर या कविता संग्रहाचा पुरस्कार जाहीर  करण्यात आला आहॆ.  रोख 11 हजार रुपये, स्मृती चिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहॆ. या पुरस्कार समारंभाप्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे. 

या पत्रकार परिषदेला शिरीष देखणे, नितीन वैद्य, विजय साळुंखे, श्रीधर खेडगीकर, पद्माकर कुलकर्णी,  शोभा बोल्ली आदी उपस्थित होते.

...चौकट

आ. सुभाष देशमुख यांच्याकडून कृषी भूषण पुरस्काराची घोषणा

या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली. लोकमंगलतर्फे हा नवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 01 जुलै रोजी याचे वितरण होणार असल्याचे आमदार देशमुख यांनी जाहीर केले.