सोलापूर : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील भूमिहिन शेतमजूर अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 2 एकर बागायत किंवा 4 एकर जिराईत जमीन 100 टक्के अनुदान स्वरुपात खरेदी करुन देण्यात येत असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिलीय.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अनुसुचित जातीचा दारिद्र्य रेषेखालील व कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे. अशा कुटुंबातील 60 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या कुटुंबा प्रमुखाच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी विक्रिसाठी जमीन उपलब्ध असलेल्या गावाचा रहिवाशी असावा. प्रस्तुत योजनेंतर्गत ज्या गावात जमीन उपलब्ध आहे, त्याच गावातील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड करण्यात येईल व त्या गावातील लाभार्थी उपलब्ध नसल्यास लगतच्या इतर गावातील पात्र लाभार्थ्यांना जमीनीच्या उपलब्धतेनुसार चिठ्या टाकून जिल्हा समितीच्या मान्यतेने विहित कार्यपध्दती नुसार पारदर्शक पध्दतीने लाभ देण्यात येईल.
या योजनेंतर्गत जमीनीचे वाटप झाल्यानंतर संबंधित लाभ धारकाने स्वता: जमीन कसणे आवश्यक आहे. सदर जमीनीचे अन्य व्यक्तीस, संस्थेस हस्तांतरण व विक्री करता येणार नाही तसेच लीजवर भाडे पट्ट्याने देता येणार नाही.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना लाभ देण्यासाठी जिल्हा समाज कल्याण कार्यालयास जमीन खरेदी करावयाची आहे. जमीन कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्रा जवळच्या क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये. जमीन सलग असावी, शेत जमीन विना बोजा व कुळ नसलेली असावी तसेच जमीन कोठेही गहाण अथवा वादग्रस्त नसावी.
तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसुचित जाती नवबौध्द घटकातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण सोलापूर यांच्या कार्यालयाकडे दाखल करावेत असं आवाहनही समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्रीमती सुलोचना सोनवणे यांनी केलंय.