Type Here to Get Search Results !

... पुन्हा कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान नाही !


सर्वोच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्याची कानउघाडणी

सोलापूर /26 नोव्हेंबर : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघाडणी करत मागणी फेटाळून लावली. 'ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगले आणि पराभूत होतात, तेव्हा ईव्हीएमध्ये छेडछाड', असे कोर्टाने म्हटले. 

ईव्हीएम बंद करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी करणारी याचिका के. ए. पॉल यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि पी. बी. वराळे यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

चंद्राबाबू नायडू, वायएस जगन मोहन रेड्डीच्या विधानाच्या संदर्भात न्यायालय म्हणाले...

 यावेळी याचिककर्त्यांनी चंद्रबाबू नायडू आणि वायएस जगन मोहन रेड्डी यांनी ईव्हीएमबद्दल उपस्थित केलेल्या शंकाकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले. त्यावर न्यायालय म्हणाले, "जेव्हा चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी पराभूत होतात, तेव्हा ते म्हणतात ईव्हीएममध्ये छेडछाड केलीये. जेव्हा ते जिंकतात, तेव्हा ते काहीच म्हणत नाहीत. याकडे आपण कसे बघायचे?", असा सवाल करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांची कानउघाडणी केली.

"काय होतंय की, जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा ईव्हीएममध्ये छेडछाड नसते. पण, जेव्हा तुम्ही पराभूत होता, तेव्हा ईव्हीएमसोबत छेडछाड झालेली असते. जगापेक्षा तुम्हाला वेगळं का नकोय?", असा सवाल न्यायमूर्तींनी केला.