मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोळी जमातीची पार पडली बैठक
पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी झालेल्या बैठकीत आमच्या आदिवासी कोळी जमातीच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, १४ जुलै रोजी आषाढी वारी तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर शहर दौऱ्यासाठी आले होते. त्यावेळी चंद्रभागा तिरी अन्यायग्रस्त महादेव कोळी जमातीच्या वतीने घेराव करण्यात आला, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्य ओळखून तातडीने कोळी बांधवांच्या शिष्टमंडळाशी संपर्क साधून चर्चेसाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक लावली.
रविवारी सायंकाळी कोळी जमातीच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यानी अर्धा तास चर्चा केली. महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नाबाबतच्या येणाऱ्या अडचणी, कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी सांगितल्या. तसेच आदिवासी मंत्री, २५ आमदार व जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या कशा पद्धतीने राज्यातील ३१ जिल्ह्यातील महादेव, मल्हार ,टोकरे ,ढोर कोळी जमाती वरती अन्याय करत आहेत, याविषयी सविस्तर माहिती दिली.
कोळी जमातीच्या प्रश्नासंदर्भात दोन वेळा रद्द केलेली मीटिंग पुन्हा घ्यावी. आदिवासी विभागाचे २५ आमदार व कोळी जमातीचे अभ्यासक व नेते यांना समोरासमोर बसवून आमचा प्रश्न सोडवावा, अशी विनंती गणेश अंकुशराव व प्रा. बाळासाहेब बळवंतराव यांनी या चर्चेत केली.
आषाढी यात्रेपूर्वी आपली कोळी जमातीच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंग झालेली आहे. आषाढी यात्रेनंतर पुन्हा आपण एक मीटिंग घेऊ, त्या मिटींगला जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी बोलवून घेऊ. अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून सोलापूर जिल्ह्यातील महादेव कोळी जमातीचा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवू, असं यावेळी शिष्टमंडळाशी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी म्हटले.
या शिष्टमंडळात महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, कोळी जमातीचे अभ्यासक प्रा. बाळासाहेब बळवंतराव, दादा करकंबकर, रघुनाथ अधटराव, अरविंद नाईकवाडी, हनुमंतराव माने, गणेश कांबळे, संपत सर्जे, लक्ष्मण नेहतराव, महेश माने, अशोक अधटराव इत्यादी उपस्थित होते. यावेळी रेस्ट हाऊस गेटवर मोठ्या संख्येने समाज बांधव व युवक उपस्थित होते.