Type Here to Get Search Results !

आषाढी वारी, स्वच्छतेची वारी...

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील स्वच्छतेबाबत प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नातून प्रशासन व मंदिर समितीने आषाढी वारीला स्वच्छतेचे स्वरूप मिळवून दिले.

तिरुपतीच्या धरतीवर दर्शन मंडप व टोकन दर्शन सिस्टीम राबवण्यासाठी प्रशासनाने सादर केलेल्या 100 कोटीच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूरी.

या आषाढी वारीत प्रशासनाकडून दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले.

आषाढी वारीसाठी पंढरपूर शहरात येणाऱ्या पालखी सोहळा प्रमुख व वारकरी यांच्याकडून स्वच्छता व अन्य सोयी सुविधा बद्दल समाधान व्यक्त, शासन व प्रशासनाचे मानले आभार.


        "आषाढी शुद्ध एकादशी, 17 जुलै रोजी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक शासकीय महापूजा केली. 'बा विठ्ठला शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखी ठेवून त्यांना समृद्धी येऊ दे..' असे साकडे मुख्यमंत्री यांनी विठ्ठल चरणी घातले. यावर्षीच्या वारीला किमान 15 ते 18 लाख भाविक आलेले होते. 

किंबहुना प्रशासनाने मागील दोन महिन्यापासून एवढ्या मोठ्या संख्येने भाविक वारीला येतील हे गृहीत धरून पालखी मार्ग व पंढरपूर शहरात वारकरी व भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गर्दीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी ड्रोन कॅमेरा व सीसीटीव्ही च्या माध्यमातून दक्ष राहणे तसेच चंद्रभागा नदीमध्ये कोणतीही आपत्ती जनक परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे व या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वारकरी व भाविकाला विठ्ठलाच्या दर्शनाबरोबरच येथील स्वच्छता व सुविधा देऊन समाधानी करणे यासाठी नियोजनबद्ध काम सुरू होते. जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रत्येक बाबीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून सर्व कामे सुरळीतपणे होत आहेत याची खात्री स्वतः करत होते, व यासाठी 11 जुलैपासून ते पंढरपूर येथेच मुक्कामी होते."

भाविकांची संख्या व सोयी सुविधा

आषाढी वारी 2024 मध्ये मागील वर्षीच्या दीडपट भाविक येतील हे गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने पालखी मार्ग विसावा व मुक्कामाची ठिकाणे व पंढरपूर शहर, वाखरी पालखी तळ तसेच 65 एकर येथे वारकरी, भाविक यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या होत्या. 

यामध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, 15 लाख पाणी बॉटल व मँगो ज्यूस, पाण्याचे टँकर, पालखीतळाचे मुरमीकरण, मुक्कामाच्या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप, चंद्रभागा वाळवंटात तात्पुरती स्नानगृहे उपलब्ध करणे, स्तनदा मतांसाठी हिरकणी कक्ष, ठिकठिकाणी आरोग्य पथके दूचाक्कीवर आरोग्य दूत, पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढणे, मोबाईल टॉयलेट, सुलभ शौचालये, व्हीआयपी दर्शन बंद, दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची काळजी या सुविधांचा समावेश होतो. वारीत किमान 15 ते 18 लाख भाविक गृहीत धरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व सुविधा व्यवस्थितपणे वारकऱ्यांना मिळतील यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांना निर्देश दिलेले होते.

प्रशासनाच्या या सर्व सोयी सुविधामुळे अनेक पालखी सोहळा प्रमुख, वारकरी व भाविक यांनी खूप समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांच्या टीमचे कौतुक केले. या वर्षाच्या आषाढी वारी पंढरपूर शहर प्रथमच खूप स्वच्छ दिसल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. रस्ते सफाई, कचऱ्याची विल्हेवाट, शौचालयाची व्यवस्था व पाण्याची उपलब्धता अशा सुविधामुळे भाविकांना याचा खूप लाभ झाला. प्रशासनाच्या सुविधामुळे भाविकांना एवढ्या मोठ्या गर्दीतही प्रशासन अत्यंत उत्तम प्रकारे काम करत असल्याचे दिसले.

पंढरपूर शहर व पालखी मार्गावर शौचालयाची स्वच्छता

शहरात सुलभ शौचालय, नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले कायमस्वरूपी शौचालय व मुख्य गर्दीच्या ठिकाणी, मंदिराकडे प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर तात्पुरती शौचालय ठेवण्यात आली. या सर्व शौचालयाच्या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्याप्रमाणेच हे शौचालय भरल्यानंतर त्यातून मैला उचलून घेऊन जाण्यासाठी नगरपालिकेने सक्शन मशीन वाहनाची व्यवस्था ठेवलेली होती. तसेच प्रत्येक शौचालयाच्या ठिकाणी साफसफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने  वेळोवेळी शौचालये स्वच्छ केली जात असल्याने खूप चांगल्या प्रकारे स्वच्छता झालेली दिसून येत आहे. 

येथे आलेल्या भाविकांना सुलभ इंटरनॅशनल संस्थेचे शौचालय 21 ठिकाणी 2062, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधणेत आलेले कायमस्वरुपी शौचालये 2 ठिकाणी 1864, एमटीडीसीमार्फत बांधण्यात आलेले 2 ठिकाणी 226, तिर्थक्षेत्र विकास आराखडयामार्फत उभारणेत आलेले कायम स्वरूपी शौचालये ठिकाणे 9 ठिकाणी 136, नगरपरिषदेमार्फत उभारणेत आलेले कायम स्वरूपी सार्व. शौचालये 21 ठिकाणी 109 व प्री फॅब्रीकेटेड शौचालये 54 ठिकाणी 1800 सिट्स अशा प्रकारचे स्वच्छ मुबलक पाण्यासह शौचालये उपलब्ध झाल्याने भाविकांनी या शौचालयाचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सर्व शौचालय स्वच्छ ठेवले जात आहेत का नाहीत याची खात्री स्वतः वेळोवेळी भेट देऊन केली. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून त्या सर्व साफसफाई कर्मचाऱ्यांना शौचालये वेळेत स्वच्छ झाले पाहिजेत यासाठी त्यांच्यावर सुपरवायझिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बैठका घेऊन सफाई कर्मचाऱ्यांनी शौचालय वेळेत स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश त्यांनी दिले होते. सुपरवायझर यांच्याशी झालेल्या बैठकामुळे साफसफाईच्या कामाला अधिक गती आलेली होती.

वारीचा मुक्काम संपला की तात्काळ स्वच्छता मोहीम

संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी यांचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पंढरीच्या दिशेने जाताना ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे, त्या ठिकाणचा मुक्काम संपल्यानंतर संबंधित नगरपंचायत व ग्रामपंचायत यांच्या वतीने तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेऊन मुक्कामाचे ठिकाणावरील साफसफाई केली जात असे. यावर्षी वारीमध्ये प्रथमच या पद्धतीने स्वच्छता मोहीम राबवल्याने स्थानिक नागरिक प्रशासनाच्या या कामाबद्दल समाधान व्यक्त करत होते.



मुख्यमंत्री यांच्याकडून स्वच्छतेबाबत प्रशासनाचे कौतुक 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी पूर्वी पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील विविध सोयी सुविधाबाबत प्रत्यक्ष पाहणी केली तसेच भाविकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी शौचालयातील स्वच्छता स्वतः जाऊन पाहिली. पालखी मार्ग व पंढरपूर शहरातील रस्ते व शौचालयाची स्वच्छता बद्दल त्यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेऊन भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी शहराचे पाच भाग- 

आषाढी वारीत आषाढी एकादशीला किमान 15 लाख वारकरी या भाविक पंढरपूर शहरात येऊ शकतात, याचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सिडेंट कमांडर, जिल्हा नगरपालिका प्रशासन व पंढरपूर नगरपरिषद यांनी पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहराचे पाच भाग करून या पाच भागांमध्ये स्वच्छतेची धुरा सांभाळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी ब्रांच डायरेक्टर ऑफ हायजिन म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी विना पवार यांची नियुक्ती केली. त्यांच्या अंतर्गत पाच वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 13 मुख्याधिकारी हे स्वच्छता नोडल अधिकारी म्हणून नेमले होते .या परिसरात चंद्रभागा वाळवंट, पत्रा शेड परिसर ,65 एकर परिसर, प्रदक्षिणामार्ग व मंदीर परिसर, बसस्थानक , अर्बन बँक असे 5 भाग करण्यात आले होते.

स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रभागा वाळवंट हा सर्वात आव्हानात्मक भाग असल्यामुळे तेथे एकूण सात भागात सात मुख्याधिकारी नेमले होते. प्रत्येक मुख्याधिकारी यांच्याकडे शहर समन्वयक, शहर अभियंता, स्वच्छता निरीक्षक, नप लिपिक तसेच सफाई कर्मचारी अशी प्रत्येकी वीस जणांची टीम नेमलेली होती. या कामाकरीता 50 स्वयंसेवकांनी सुद्धा मदतीचा हातभार लावला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीपूर्वी सोयी सुविधाचे पहाणी करताना चंद्रभागा वाळवंटात स्वच्छतेच्या दृष्टीने आणखी मनुष्यबळ वाढवण्याबाबत सुचित करण्यात आले होते, तसेच चंद्रभागा नदीकडेच्या दोन्ही बाजूचे स्वच्छता वेळोवेळी करून संपूर्ण वाळवंट स्वच्छ राहील, याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रशासनाने अत्यंत चोखपणे नियोजन करून वाळवंट परिसर स्वच्छ ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 

चंद्रभागा वाळवंट परिसरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात,  या परिसरात वारकऱ्यांना, भाविकांना, महिलांना स्वच्छतेची सुविधा देण्याकरता एकूण 400 तात्पुरते शौचालय उभारले गेले होते ,पूर्ण शहरात एकूण 2000 तात्पुरते शौचालय उभारले गेले होते, या शौचालयाची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण त्यातील मैलाचे सक्शन तसेच शौचालयासाठी पाण्याचा पुरवठा व हँडवॉशची सुविधा व वारंवार स्वच्छता करून घेण्यासाठी या सर्व मुख्याधिकारी व त्यांच्या जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली तर पंढरपूर मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सर्व पथकास आवश्यक साधनसामग्री अत्यंत तत्परतेने उपलब्ध करून दिली.

आषाढी एकादशी पासून पंढरपूर शहर स्वच्छता

आषाढी एकादशीच्या रात्रीपासुनच 24 तास स्वच्छता व कचरा गोळा करण्याचे काम हाती घेतले असुन याकामी शहरासह 65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी 1348 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, यामध्ये 348 कायम तर 1000 हंगामी कर्मचारी तसेच इतर नगर पालिकेकडून ही स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत.

65 एकर, नदीपात्र वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनबारी पत्राशेड गोपाळपुर रोड, मंदिर परिसर आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर नगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत  तसेच 41 घंटागाडी द्वारेही कचरा गोळा करण्याचे काम यात्रा कालावधीत अहोरात्र चालु आहे. शहरामध्ये कचरा त्वरीत उचलण्यासाठी आरोग्य विभागाकडील 8 टिपर, 2 कॉम्पॅक्टर, 1 डंपरप्लेसर, 4 ट्रॅक्टर ट्रॉल्या व जेसीबीच्या सहाय्याने दररोज 70 ते 80 टन कचरा उचलण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये स्थानिक नागरिकांनी व भाविकांनी आरोग्य सुव्यवस्थीत राहण्यासाठी प्रशासनास आतापर्यंत चांगले सहकार्य केले आहे.

व्हीआयपी दर्शन बंद व दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही, यासाठी उपाय योजना 

जिल्हा प्रशासनाने दर्शन रांगेत होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी यावर्षी चांगली उपायोजना केलेली होती. दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येईल, याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेप्रमाणे काढले होते. दर्शन रांगेत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी तासनतास थांबलेल्या भाविकासमोर अन्य भाविकांनी घुसखोरी करू नये, म्हणून ठिकठिकाणी होऊ डबल बॅरिकेडींग केलेले होते. अशा ठिकाणी पोलिसासोबतच मंदिर प्रशासनाचे कर्मचारी नियुक्त केलेले होते, जे पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते. त्यामुळे यावर्षीच्या आषाढी यात्रेत कोठेही दर्शन रांगेत घुसखोरी झालेली नाही. दर्शनासाठी लागणारा कालावधी ही यामुळे कमी झाला असल्याने  वारकरी, भाविक यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.

त्याप्रमाणे यावर्षी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी खूप वेळ भाविकांना थांबावे लागत असल्याने मंदिर ते पत्रा शेड गोपाळपूर या दर्शन रांगेत चार ठिकाणी विसावा केंद्र निर्माण केलेले होते. ज्यामुळे भाविकांना थकवा आल्यास ते या विसावा केंद्रात आराम करत होते. दर्शन रांगेतील या सुविधामुळे तासंतास दर्शनासाठी थांबावे लागत असले तरी विसावा केंद्रामुळे त्यांचा थकवा निघून जात होता. दर्शन रांगेतील विसावा केंद्र ही संकल्पना भाविकांसाठी खूपच लाभदायी ठरलेले दिसून येत आहे. त्याप्रमाणेच व्हीआयपी दर्शन बंद केल्यामुळे भाविकांकडून प्रशासनाचे फार मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही व्हीआयपी दर्शन बंद करण्याबाबत प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला संपूर्ण पाठिंबा दिला व वारकरी, भाविक हेच खरे व्हीआयपी असल्याचे सांगितले.

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी 

या उपक्रमांतर्गत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी भाविक यांना आरोग्य  सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यात्रा कालावधीत सुमारे 15 लाख वारकऱ्यांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पंढरपूर येथे चार ठिकाणी महा आरोग्य शिबिरे सुरू करण्यात आली होती तर तीन ठिकाणी अतिदक्षता विभाग उभारण्यात आलेले होते.

108 रुग्णवाहिकेव्दारे 1437 गंभीर रुग्णांना अत्यावश्यक सेवेचा लाभ

आषाढी  यात्रा कालावधीत भाविकांना प्रशासनाकडून सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या होत्या. यावेळी वारकऱ्यांना आरोग्याच्या तात्काळ व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने  30  रुग्णवाहिका (108) या वारीत सहभागी झाल्या होत्या. या रुग्णवाहिकेच्या  माध्यमातून वारीत 1, 437 गंभीर रुग्णांना अत्यावशक सेवेचा लाभ झाला. या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यास 108 रुग्णवाहिका  यशस्वी ठरली. भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी  17 रुग्णवाहिका वेगवेगळ्या ठिकाणी थांबवलेल्या होत्या तसेच 11 रुग्णवाहिका आरोग्य शिबीर ठेवण्यात आल्या होत्या तर 2 रुग्णवाहिका या रिलेसाठी राखीव ठेवलेल्या होत्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर येथे ठाण मांडले

यावर्षीची आषाढी वारी ही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासाठी पहिलीच वारी होती. यावर्षी पाऊस वेळेवर झालेला असल्याने शेतकऱ्यांच्या पेरणी झालेली होती. त्यामुळे मागील वर्षीच्या दीडपट भावी येतील ही प्रशासनाची अपेक्षा होती, त्याप्रमाणे किमान 15 ते 18 लाख भाविक गृहीत धरून प्रशासन त्यांच्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करत होते.  

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारीत भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दिनांक 11 जुलै 2024 पासून पंढरपूर येथेच मुक्काम केला व सर्व प्रशासकीय यंत्रणा अत्यंत गतिमान पद्धतीने राबवून पालखी वारकरी व भाविकांना सर्व सुविधा उत्कृष्ट व वेळेत मिळतील यासाठी स्वतः लक्ष घातले. जिल्हाधिकारी स्वतःच पंढरपूर येथे ठाण मांडून बसले असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा व त्यांचे प्रमुख अत्यंत गतीने त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत होते. सोयी सुविधा देण्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी तात्काळ सोडवल्या जात होत्या.

आपत्ती व्यवस्थापन

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मार्फत चंद्रभागा नदीमध्ये बुडणाऱ्या जवळपास 50 भाविकांना वाचवण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकात 105 कर्मचारी काम करत होते. चंद्रभागा नदीपात्रात बोटी चालवणाऱ्या नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आलेले होते. संबंधित बोट चालकाने लाइफ जॅकेट घातल्याशिवाय त्यांना नदीपात्रात जाऊ दिले जात नव्हते. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे दहा बचाव बोटी, नऊ वॉटरप्रूफ वाकी टॉकीज, दोन सर्च लाइट्स, 15 टॉर्च, 55 लाइफ जॅकेट्स  व दोन ॲम्बुलन्स आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.

दर्शन मंडप व स्काय वॉक साठी शंभर कोटी मंजूर

श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारी कालावधीत पत्रा शेडच्या माध्यमातून तात्पुरती सुविधा निर्माण केली जाते यासाठी प्रतिवर्षी दोन ते तीन कोटीचा खर्च मंदिर प्रशासनाला येतो. व त्या प्रमाणात भाविकांना सुविधा मिळत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्वतः पुढाकार घेऊन दर्शन रांगेत भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी चार मजली दर्शन मंडप व स्कायवॉक तसेच दर्शनाची सुविधा तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने करण्याच्या दृष्टीने शंभर कोटीचा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर केला. या आराखड्यातून भाविकांना सुविधा मिळत असल्याने मुख्यमंत्री यांनी तात्काळ 100 कोटीच्या निधीला मान्यता प्रदान केली. त्यामुळे पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर हालचाली सुरू झालेल्या आहेत. हा आराखडा प्रत्यक्षात आल्यानंतर भाविकांना तासून तास न थांबता त्यांच्या टोकन क्रमांक प्रमाणे दर्शन मिळणार आहे तसेच दर्शन मंडपात त्यांना अनेक सुविधा मिळणार असल्याने त्यांचा दर्शनाचा कालावधीही कमी होऊन दर्शनही अत्यंत सुरळीतपणे होणार आहे. 

संपूर्ण आषाढी यात्रा यशस्वी होण्यात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,  पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिलेल्या सूचनांमुळे भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन यशस्वी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, मंदिर समिती प्रशासन, जिल्हा परिषद व पोलीस प्रशासनाने अहोरात्र मेहनत घेऊन यात्रा यशस्वी होण्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक केले. व संपूर्ण पालखी मार्ग व पंढरपूर शहरात ठेवलेल्या स्वच्छतेबद्दल समाधान व्यक्त केले. 

आषाढी वारी 2024 अंतर्गत सर्व वारकरी व भाविकांना सोयी-सुविधाबाबत विविध पालखी व दिंडी प्रमुखांनी व्यक्त केलेली मते...

श्री. योगी निरंजन नाथ 
संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख
सोलापूर जिलह्यातील प्रवेशापासून सर्व स्तरातून पोलीस व  महसूल प्रशासनाकडून चांगला प्रतिसाद मिळाला.  दरवर्षी प्रश्नमालिका असायच्या यावर्षी उत्तरमालिका मिळाल्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  सोलापूर जिल्हा प्रशासनाने दक्षतेने काम केले आहे.  पंढरपूर स्वच्छता यावर्षी नक्कीच चांगली झाली आहे.  पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने स्वच्छतेवर फार लक्ष दिले आहे. यंदा पालखी सोहळ्यामध्ये प्रशासनाचे सहकार्य व मदत मिळाली.  ही वारी कायम स्मरणात राहील, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.  तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व मुख्याधिकारी यांचे धन्यवाद योगी निरंजन नाथ यांनी शेवटी व्यक्त केले.

श्री. माणिक गोविंद मोरे,
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख..
सोलापूर जिल्ह्यात सराटी–अकलूज येथून प्रवेश केल्यानंतर अडचणी होत्या. रस्ता, पालखी तळ यांचे प्रश्न होते.  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांचे टिम यांनी अतिशय चांगले काम केले. पालखी तळावर चांगली सोय झाली. वारकरी पाऊसामध्ये मांडवामध्ये झोपले. पोलीस प्रशासन, पाणी पुरवठा विभाग, आरोग्य प्रशासन, तहसिलदार व प्रांताधिकारी यांनी मनापासून संताची सेवा केली. या वर्षी पंढरपूरमध्ये उच्चांकी गर्दी होती.  प्रशासनाने कुशलतेने उत्तम नियोजन केले. संताची शिकवण या देशाला महासत्ता बनविणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व मुख्याधिकारी यांचे मनापासून अभिनंदन यावेळी मोरे यांनी केले.

मोहन महाराज बेलापूरकर
श्री संत निवृत्ती नाथ महाराज पालखी सोहळा प्रमुख यांची मुलाखत 
श्रीमान निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा या ठिकाणी त्रंबकेश्वर ते पंढरपूर प्रस्थान होऊन आज या ठिकाणी आशाढी शुद्ध दशमीला आमच्या निवृत्तीनाथ मंदिरामध्ये वेलापुरकरांच्या अमळनाथ करांच्या मठामध्ये विसावलेला आहे. आणि हा सोहळा परंपरेप्रमाणे प्रथेप्रमाणे हा चालत आलेल्या गेले 145 वर्षाचा हा सोहळा चा अशा प्रकारचा इतिहास आहे मुख्य मानकरी म्हणून मी मोहन महाराज बेलापूरकर पूजा अधिकारी जैन महाराज गोसावी त्याचबरोबर मानकरी डावरे महाराज असे तीन प्रमुख मानकरी या ठिकाणी या सोहळ्यामध्ये आहे त्याचबरोबर अध्यक्ष कांचनताई जगताप विश्वस्त मंडळ त्र्यंबकेश्वर संस्थान आणि अशा प्रकारे हा सर्वांच्या एक विचाराने हा सोहळा या ठिकाणी त्रंबकेश्वर ते पंढरपूर यावर्षी एक लाखाची संख्या सोहळ्यामध्ये बरोबर होती तर तीन जिल्ह्यामधून हा सोहळा येतो तर नाशिक, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात शिंगोटे ते सोलापूर जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांचे पालखीचा आगमन होता तेथील करमाळ्याचे तहसीलदार साहेब प्रांत साहेब या सर्वांनी अतिशय उत्साहांमध्ये त्यांनी निवृत्त पालखीचे स्वागत केलं व्हिडिओ असतील ते बांधकाम विभागाचे असतील पाणीपुरवठ्याचे असतील आरोग्य विभाग असेल त्या ठिकाणी सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या या सोहळ्याचे स्वागत केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था आम्हाला सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी दिली मी शासनाचे खूप मोठे आभार मानतो यावर्षी निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यामध्ये असा प्रकारचा एक सुविधा अतिशय चांगली मिळाली. ई- टॉयलेट यावर्षी संख्येच्या मानेत अडीचशे ई टॉयलेट होते. पुढच्या वर्षी संख्या आणखीन जास्त द्वीगुणीत होणार वाढणार आहेत. त्याची अजून पुढच्या वर्षी आवश्यकता भासणार आहे त्याचबरोबर पाण्याची टँकरही पुढच्या वर्षी वाढतील आमची एकच विनंती आहे की हा सोहळा ज्यावेळी परतीच्या मार्गाला निघतो त्यावेळेस करमाळा पर्यंत आम्ही जेऊरला रोडला लागतो परंतु हे मधले तीन गाव तुळशी पिंपळनेर, केम आणि जेऊरला कोंडीज मार्गे जेऊरला जातो निंभोऱ्यावरून तो रस्ता आमचा चांगला व्हावा अशी आमची फार मोठी कळकळीची इच्छा आहे की तो पालखी मार्ग रोडला लागेपर्यंत तो व्यवस्थित व्हावा डांबरीकरण व्हावं अशी आम्ही नेहमी आपल्याकडून आपल्या मार्फत शासनाला आम्ही विनंती करतो की हा रस्ता व्हावा, म्हणजे पुढे त्र्यंबकेश्वरपर्यंत आम्हाला पुढे हवे आहे पुढे अडचणी येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की, सर्व प्रशासन त्याचबरोबर पोलीस यंत्रणा नाशिक जिल्हृयातील पोलीसांची यावर्षी नाशिक जिल्ह्याची गाडी आहे ते रिटर्नपर्यंत आहे. व्यवस्था सर्व काही व्यवस्थित आहेत, पण पुढच्या वर्षी तेच आणखीन एक दुसरी अडचण म्हणजे निवृत्ती नाथ पालखी अहिल्या पुलावरून येते चिंचोली भोसई येथून येत असताना तो पूल आता अरुंद वाटतो, आम्हाला खूप गर्दी आहे रहदारी आहे. पालखीला येताना इतकी गर्दी होते आणि येणारी वाहतूक पुन्हा जाणारी वाहतूक अशा प्रकारची गर्दी होते तर त्या ठिकाणी शेजारीच अजून एक फुल व्हावा, अशी आमचे आणि अनेक दिंड्या अनेक पालख्या त्या पुलावरून जातात आणि त्यामुळे वाहनांची बसची आणि अनेक वाहणे या ठिकाणाहून वारकऱ्यांची आणि पालखीची अशी अनेक गर्दी त्या पुलावरती होते आणि भविष्यामध्ये त्या पुलाची उंची पण अजून कमी आहे. त्यामुळे थोडा अजून उंच फुल व्हायला पाहिजे की, जेणेकरून उद्या जर भविष्यात अचानक पाणी पुलावरती आलं तर पालख्या पलीकडे जाणार कशा? हा एक विचार आहे आणि या दृष्टीने जसं नाथ महाराजांना पूल तयार करून दिला त्या ठिकाणी शेवतेच्या जवळ कवठाळीचा त्याप्रमाणे निवृत्तीनाथांसाठी आणि सर्वांसाठी म्हणजे पंढरपूरकर वासियांसाठी पण आहे सर्वांसाठी आहे की, अजून एक फुल तिथं व्हावा, अशी आमची शासनाकडे मागणी बाकी शासनाने चांगल्या प्रकारे सुविधा दिला, त्याबद्दल आम्ही सर्वांचे धन्यवाद मानतो.

रवींद्र महाराज हरणे
श्री संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख मुक्ताईनगर ते पंढरपूर

मा.मुख्यमंत्री आणि प्रशासनाने या सोहळ्याला यावर्षी 2024 मध्ये बरेचशे सुविधा प्रदान केल्या, त्यामध्ये विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये जेव्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सोहळ्याचा प्रवेश झाला, त्यावेळी त्याचे स्वागत केल्याच्या पाण्याची व्यवस्था आरोग्याची आणि शौचालयाची हरितवारी निर्मलवारी सुरक्षित वारी या उपक्रमांतर्गत सर्व सुविधा पुरविण्यात आल्या, पंढरपूर मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था शासनाच्या मार्फत झाली आणि परंतु वारकऱ्यांना ज्या काही आरोग्याच्या सुविधा आणि पिण्याच्या पाण्याचे ते सरकार ठेवले स्वच्छता चांगली होती फक्त पंढरपूरला आम्ही आल्यानंतर आदिशक्ती मुक्ताबाईच्या पादुकांना जे स्नान घालायचे त्या बाजूला प्रशासनाने मुक्ताई घाट बांधून द्यावे, तेथे जाताना येताना मुक्ताईच्या पादुकांना स्नान घालता येईल. आणि पखाये मध्ये शौचालयाची व्यवस्था करून द्यावी, प्रत्येक मजल्यावर झालेल्या सुविधेबद्दल दिलेल्या सहकार्याबद्दल शासनाने दरवर्षीपेक्षा यावर्षी चांगल्या प्रकारे व्यवस्था या पालखी सोहळ्यामध्ये ठेवली त्याबद्दल धन्यवाद.
शिवभार - जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर.