टंचाई परिस्थितीला दूर करणारी नाविन्यपूर्ण कामे करावीत : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

shivrajya patra

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची उपलब्धता करण्यात येईल

सोलापूर : जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने टंचाईची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणानी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. टंचाई सदृश्य परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी अधिक सक्रीय होऊन गुणवत्तापूर्ण, टंचाई परिस्थितीला दूर करणारी नाविन्यपूर्ण कामे करावीत. दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजन मधून निधीची उपलब्धता करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी  मनीषा आव्हाळे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी  दादासाहेब  कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी  नगरपालिका  वीणा पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गावसाने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा जंलसंधारण अधिकारी दामा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी तसेच संबधित अन्य विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.


जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, सार्वजनिक पाण्याच्या स्त्रोतांची असलेल्या जागांची माहिती अद्यावत करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणच्या ५०० मीटर अंतराच्या खाजगी स्त्रोतांना पाणी उपसा बंदीचे आदेश प्रांताधिकारी यांनी द्यावेत. तसेच तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेऊन कोणत्या भागात पूरेसा चारा उपलब्ध आहे आणि कोणत्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता जाणवू शकते हे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने चारा आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे शक्य होईल, यादृष्टीने प्रभावी वितरण व्यवस्थेचे व्यापक नियोजन करावे. त्याचबरोब चारा लागवडीसाठी गाळपेर क्षेत्राची निश्चित आकडेवारी सादर करावी.



जिल्ह्यात कोणत्या गावात टँकरची आवश्यकता आहे. याची संबधित तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा उपअभियंता, भुजल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करुन पाणीपुरवठ्यासाठी मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात यावे. दुष्काळ परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सेल्फ वरील कामे सुरू करावीत .अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी  दिल्या.


गाळ मुक्तधरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत १४६ कामे मंजूर असून ६१ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८५ कामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात ९० ठिकाणी ११०.७६ हेक्टर क्षेत्र गाळपेरसाठी उपलब्ध होणार आहे. मृद व जलसंधारणाची तसेच रोजगार निर्मितीची १७, १५३ कामांचा सद्यस्थितीत शेल्फ तयार असून त्यामधून ५१.३८ लक्ष इतके मनुष्य दिवस तयार होणार असल्याचे सादरीकरणात माहिती देण्यात आली.

To Top