पंढरपूर : कोळी समाजातील समाजबांधव गेल्या १८ दिवसांपासुन आमरण उपोषणाला बसलेले आहेत, याठिकाणी अद्याप एकही राजकीय नेता फिरकलेला नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते विजयकुमार वडेट्टीवार कुठे आहेत हे नेते ? असा खडा सवाल यावेळी गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केलाय.
गेल्या १८ दिवसांपासुन जातीच्या दाखल्यासाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी कोळी जमात बांधवांच्या आंदोलनस्थळी अद्याप एकही राजकीय नेता भेट देण्यास आला नाही, यावर आदिवासी कोळी बांधवांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत, ‘आज राज्यात मराठा समाजासह अनेक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलनं करत आहे, या सर्व ठिकाणी विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी भेट देत आहेत, परंतु आमच्या आदिवासी महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी यांच्या आंदोलनाकडे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पाठ फिरवलीय.
सत्ताधार्यांसह विरोधीपक्ष नेते हे केवळ मतांचा आकडा बघून राजकारण करताना आढळत आहेत, आमची बाजु सत्याची असुन आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या मागण्यांचा विचार केला जात नाही, आमच्या आंदोलनांची दखल घेतली जात नाही. जळगावमधील आंदोलनकर्त्यांची तब्येत ढासळत आहे, तरी सुध्दा इकडे नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे, हेच का तुमचे राजकारण? हीच का तुमची समाजसेवा ? हीच का तुमची संविधानाबद्दलची निष्ठा ? जात बघुन आंदोलनकर्त्यांकडे जायचे की नाही हे ठरवणारे तुम्ही एक लक्षात घ्या, आमचा फक्त मतासाठी वापर करुन घेत आहात, असेही गणेश अंकुशराव यांनी असं म्हटलंय.
आता यापुढे आमच्या जमात बांधवांकडून तुम्हाला योग्य वेळी योग्य जागा दाखवून दिली जाईल, आमच्या जमातीतील मतदार हा महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात निर्णायक ठरणारा मतदार आहे, आमच्या जमातीचे हित पाहणाऱ्यांना आम्ही आमचे अनमोल मत यापुढे देऊ आणि आमच्याकडे पाठ फिरवणारांना घरी बसवू, असा इशाराही गणेश अंकुशराव यांनी यावेळी दिलाय.
जळगावमध्ये सध्या आदिवासी कोळी बांधवांचे सुरु असलेले उपोषणस्थळी भेट न देणार्या राजकीय नेत्यांचा उद्या महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी आदिवासी कोळी जमात बांधवांकडून राज्यात ठिकठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करावा. स्वत:ला मोठे समजणार्या परंतु मनानं छोटे असलेल्या या जातीयवादी नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवून द्यावी, असा संदेश यावेळी गणेश अंकुशराव यांनी समाजबांधवांना दिला असून आंदोलनकर्त्या बांधवांच्या जीवाचं कांही बरे-वाईट झाले तर सरकारला आणि विरोधकांनाही झेपणार नाही, असे तीव्र आंदोलन महाराष्ट्रात ठिकठिकाणी करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय.