जिल्ह्यातील 1, 078 गावातील 26, 253 पात्र थकबाकीदार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिध्द
जिल्ह्यातील 19, 800 लाभार्थ्यांनी केली ई-केवायसी पूर्ण
जिल्ह्यातील 6, 500 लाभार्थी आधार प्रमाणीकरणासाठी ई-केवायसी करणे बाकी
सोलापूर : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील 1, 078 गावातील 26, 253 पात्र थकबाकीदार लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी गावातील विकास संस्था, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यातील 19, 800 लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र व संबंधीत बँक शाखेच्या माध्यमातून त्यांचे ई-केवायसी पूर्ण करून घेतलेले आहे. तरी अद्याप जिल्ह्यातील जवळपास 6, 500 लाभार्थी आधार प्रमाणीकरणान्वये ई-केवायसी करणे बाकी असून सदर पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी ई-केवासी (आधार प्रमाणीकरण) करणे अनिवार्य आहे. या पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घेणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून त्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम शासनाकडून जमा झाले नंतर ते नव्याने पीक कर्ज घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी, 7 ऑगस्ट रोजी व्ही. सी. द्वारे झालेल्या बैठकीत त्यांनी आजपर्यंत आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीचा लाभ डीबीडीद्वारे जमा केले असल्याचे सांगितले. कर्ज मुक्तीनंतर शेतकऱ्यास कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
कर्ज मुक्त झाल्यानंतर सर्व कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या संबंधीत बँकेच्या शाखेत व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामध्ये लावण्यात येणार आहे. कर्ज मुक्तीचा लाभ मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना संबंधीत बँकेमार्फत त्वरीत पीक कर्जाची उपलब्धता होणार आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून आज 2, 529 लाभार्थ्यांना रक्कम रू. 25.33 कोटी खात्यावर जमा झालेली आहे. इतर राष्ट्रीयकृत बँकामध्येही पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर रकमा जमा झालेले असून त्याबाबतचे संदेश शेतकऱ्यांना शासनाकडून देण्यात आलेले आहेत.
कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवरील रक्कम किंवा पोर्टलवरील शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत इतर कोणताही तपशील शेतकऱ्यास अमान्य असल्यास लाभार्थ्याने पोर्टलवर तक्रारीची (Grievance) नोंद करावी. त्या तक्रारीचे निराकरण जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीमार्फत केले जाणार आहे.
ज्या पात्र लाभार्थ्यांचे निधन झाले आहे, अशा लाभार्थ्याच्या वारसाने बँकेकडे मयत कर्जदाराच्या कर्ज खात्यास वारस नोंद करण्याची कार्यवाही करणे व अॅग्रीस्टॅक काढून बँकेस कळविल्यानंतर सदर कर्ज खात्याच्या कर्ज माफीबाबत बँकेमार्फत पुढील कार्यवाही होणार आहे.
आधार प्रमाणीकरण करताना कोणतीही अडचण असल्यास लाभार्थ्यांनी संबंधीत तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयामध्ये संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले आहे.
****
