आषाढी वारी 2026 : बार्शी शहरात मानाच्या रुक्मिणी माता पालखीचे भक्तिमय वातावरणात आगमन

shivrajya patra

जिल्हा प्रशासनाकडून पालखीचं स्वागत; वारकऱ्यांच्या जयघोषाने शहर दुमदुमले  

सोलापूर : आषाढी वारी 2026 च्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या मानाच्या श्री विठ्ठल रखुमाई संस्थान कौंडण्यपूर (विदर्भ) पालखीचे आज बार्शी शहरात आगमन झाले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे पारंपरिक पद्धतीने व भक्तिभावाने तहसीलदार एफ. आर. शेख यांनी स्वागत केले.  

रुक्मिणी माता पालखीचे बार्शी शहराच्या वेशीवर आगमन होताच फुलांचा वर्षाव करून व आरती ओवाळून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. आषाढी वारीसाठी राज्यभरातून मानाच्या दहा पालख्यांसह शेकडो दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करत असून रुक्मिणी माता पालखीचा हा मार्गातील महत्त्वाचा टप्पा आहे.

पालखीच्या स्वागतावेळी शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ आणि ‘रुक्मिणी माता की जय’ अशा जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि पताका-तुळशी वृंदावन घेऊन वारकरी आनंदाने मार्गक्रमण करत होते. शहरातील नागरिकांनीही ठिकठिकाणी रांगोळ्या काढून व पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले.  

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर व तालुक्यातून जाणाऱ्या सर्व पालख्यांसाठी प्रशासनाने पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, फिरते शौचालय, निवारा शेड आणि वाहतूक व्यवस्थापन अशी चोख व्यवस्था केली आहे. पालखी सोहळा निर्विघ्न व सुरक्षितपणे पार पडावा यासाठी पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथके आणि महसूल विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

                       **

To Top