‘इफ्तार संवाद’ मधून सर्वधर्मीय महिलांचा विसंवादावर मात करण्याचा निर्धार
एशिअन सेंटर फॉर सोशल स्टडीज आणि सावित्री महिला संघटनेचा उपक्रम
सोलापूर : भारतीय समाजाची बहुसांस्कृतीक विण आधिक मजबूत करण्यासाठी सांस्कृतीक पातळीवरचा संवाद महत्वाचा आहे. विविध भाषा बोलणाऱ्या, धर्म जपणाऱ्या भारतीय समाजातील एकजूटता ही संवादाच्या माध्यमातूनच आधिक मजबूत होऊ शकते. त्यामुळे ‘इफ्तार संवाद’ सारख्या उपक्रमातून सर्वधर्मीय महिलांनी विसंवादावर मात करत भारतीय समजाला आधिक विकसित व उन्नत करण्याचा निर्धार केला. 
एशिअन सेंटर फॉर सोशल स्टडीज आणि सावित्री महिला संघटनेच्यावतीने ‘इफ्तार संवाद’ या कार्यक्रमाचे सोशल शाळेमध्ये आयोजन करण्यात आले होते. 
या कार्यक्रमासाठी औपचारीक परंपराना फाटा देत कोणालाही प्रमुख पाहुणा अथवा वक्ता म्हणून निमंत्रीत करण्यात आले नव्हते, तर आलेल्या महिलांनांच आधिक प्रमाणात आपले अनुभव मांडता यावेत, यासाठी खुले विचारपीठ उपलब्ध करुन दिले होते. 
सुरुवातीला संस्थेचे प्रमुख आसिफ इकबाल आणि सावित्री संघटनेच्या सरिता मोकाशी यांनी प्रस्ताविक व स्वागत केले. त्यानंतर उपस्थित महिलांना बोलण्यासाठी संधी देण्यात आली. तत्पूर्वी रमजान हा केवळ खाद्य उत्सव नाही तर शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाची नैसर्गिक व्यवस्था आहे असं डॉ. आसिफ इक्बाल यांनी सांगितले.
सुरुवातीला सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ताँ हमारा आणि सावित्रीची ओवी गाण्यात आली. निशा भोसले, सुनिता गायकवाड, मोनिका सरकार, अॅड. पिरजादे, अफसाना बेग आदिंनी 'महिला एकमेकांशी संवाद साधतील, तेव्हाच त्या स्वतःच्या समस्यांवर उपाय शोधू शकतील आणि भाईचारा वाढीस लागेल.
त्यामुळेच या महिलांना सांस्कृतिक सण, उत्सवांच्या माध्यमातून एकत्रित येण्याची संधी दिली पाहिजे. ज्यातून त्या आधिक जवळ येतील आणि संघटीत होऊ शकतील.’ असे विचार व्यक्त केले. 
यावेळी उपस्थित महिलांपैकी अनेकांनी दिवाळी, ख्रिसमस अशा सणांवेळी असे कार्यक्रम आयोजित केले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी सर्व महिलांनी हातात हात धरुन 'हम होंगे कामयाब' हे गीत एकसुरात म्हटले. 
यावेळी डॉ. अस्मिता बालगांवकर यांनी ‘महिला एकमेकांशी संवाद साधतील, तेव्हाच त्या स्वतःच्या समस्यांवर उपाय शोधू शकतील. त्यामुळेच या महिलांना सांस्कृतिक सण, उत्सवांच्या माध्यमातून एकत्रित येण्याची संधी दिली पाहिजे. ज्यातून त्या अधिक जवळ येतील आणि संघटीत होऊ शकतील.’ अशी अपेक्षा व्यक्त केली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुमित्रा देशमुख यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकला देशमुख, मोईज सिराज अहमद, अल्ताफ कुडले, वाईज सय्यद, आकिद शेख, कुदसिया मनियार, गौसिया याकूब अली, समिना मनियार, निकहत परवीन, शबाना काझी, रेहाना शेख, विकारुन्नीसा बंदुकवाले यांनी परिश्रम घेतले.
