रमजानुल मुबारक - २९ ... समानता हेच सूत्र !

shivrajya patra

पवित्र रमजान महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. उद्या संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर रमजान महिना पूर्णत्वास जाऊन शव्वाल महिन्यास प्रारंभ होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या तारखेस रमजान ईद अर्थात ईद-उल-फित्र साजरी केली जाते. गेले महिनाभर सर्वांनी अल्लाहचा हा महिना त्याच्या आदेशाप्रमाणे पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. (असं आम्ही म्हणतोय, नेमकं कसं केलं ते त्यालाच माहीत).

रोजे, नमाज, तरावीह, तसाबिह (जप), जकात, सदकात, खैरात या सर्व मार्गांनी अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रत्येकाने आपल्या इच्छा शक्तीप्रमाणे प्रयत्न केला आहे. अल्लाहतआला सर्वांचे रोजे, नमाज आणि त्यांनी केलेले इतर सर्व पुण्यप्राप्तीची साधने स्वीकार करो... आमीन !                 

इस्लाम धर्माने मसावात म्हणजे समानता किंवा समता या सूत्राला फार महत्व दिले आहे. अल्लाहच्या नजरेत कुणीही लहान-मोठा,उच्च- नीच, काळा-गोरा,आपला-परका असा भेद नाही. सर्व मानव त्याच्यासाठी समान आहेत. खूप श्रीमंत आहे म्हणून त्याला वेगळी वागणूक इस्लाममध्ये नाही. गरीब आहे म्हणून त्याचा तिरस्कार नाही. काळा आहे म्हणून दूरचा आणि गोरा आहे म्हणून जवळचा हा भेद मान्य नाही. आपला आणि परका तर नाहीच नाही.

मशिदीमध्ये नमाजसाठी ज्या वेळी लोक एकत्र येतात, त्यावेळी ज्याला जिथे जागा मिळेल त्याने तिथे बसायचे असते. नमाजसाठी उभे राहताना कुणीही कुणाच्या शेजारी उभा राहू शकतो. बादशाहच्या शेजारी भिकारीसुद्धा उभा राहू शकतो. तिथे भेदभाव नाहीच. मशिदीमध्ये फक्त एकच नामस्मरण महत्त्वाचे असते, ते म्हणजे अल्लाहो अकबर. अर्थात अल्लाह बडा है म्हणजे ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा मोठा कोणीच नाही.

प्रेषित हजरत पैगंबरांनी समतेच्या सूत्राने इस्लाम धर्माचा प्रसार केला. सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी इस्लाम धर्म वाढवला. हब्शी गुलाम हजरत बिलाल यांना श्रेष्ठ असा दर्जा दिला. काळा आणि गोरा भेद नष्ट केला.

स्त्रियांना सर्वात महत्त्वाचे स्थान दिले. मातेचे पायाखाली जन्नत आहे. तिची सेवा करा. आयुष्यभर सेवा करूनही तुम्ही मातेचे ऋण फेडू शकत नाही, हा अतिशय मोलाचा संदेश जगाला दिला.

इस्लामने स्त्रियांना सर्वाधिक स्वातंत्र्य दिले. दुर्दैवाने त्याचा प्रसार करण्यास आम्ही कमी पडलो. स्त्रियांबद्दल चुकीचे चित्र निर्माण केले गेले. बुरख्याचा विपर्यास केला गेला. परंतु आज जगाने हे मान्य केले आहे कि, इस्लाम धर्माने स्त्रियांना मानाचे स्थान दिले. बुरखा हा स्त्रीच्या रक्षणासाठी आहे, हे आज सिद्ध झाले आहे.

बुरखा परिधान केल्याने कोणतीही महिला सामाजिक, वैचारिक, शारीरिक दृष्ट्या मागे जात नाही. सर्वांगाने तिचे रक्षण होते. कुटुंबाचे चांगल्या पद्धतीने पालन-पोषण करणारी स्त्री जन्नती आहे, हे देखील हजरत पैगंबरांनी नमूद केले होते. आज समाजामध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारल्या जातात. प्रत्यक्षात मात्र महिलांकडे दुर्लक्ष केले जाते.

इस्लाम धर्माने या प्रकाराला छेद दिला. आईचे रूप सर्वश्रेष्ठ आहे हे जगाला सांगितले. रमजान महिना संपन्न होत असताना जगावर अमेरिकेने युद्ध लादले आहे. या युद्धाच्या झळा सर्व जगाला लागत आहेत.

अल्लाहकडे एकच प्रार्थना आहे कि, ऐ अल्लाह या युद्धापासून समस्त मानव जातीचे रक्षण कर आणि ज्यांनी कोणावर अन्याय केला असेल त्यांना नीट समज दे. कुणावरही जुलूम होणार नाही अशी व्यवस्था निर्माण कर आणि जर हा तुझा आजाब (संकट) असेल तर आमचे रक्षण कर. आम्हाला माफ कर.आमची ही दुआ कुबूल कर... आमीन ! (क्रमशः)

सलीमखान पठाण

To Top