Type Here to Get Search Results !

आश्‍वासन ' पूर्ती ' न झाल्यानं आ. देशमुख यांचं मंगळवारी आंदोलन

सोलापूर : सीना नदीकाठच्या शेतकर्‍यांनी पाण्याबाबत सिंचन भवन येथे सोमवारी, 05 मे रोजी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना सोमवारी, 12 मे  रोजी पाणी कुरुल शाखा कालव्यातून कि. मी. 14 मधून महादेव ओढा मार्गे सीना नदीत पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनाची ' पूर्ती '  न झाल्यानं सिंचन भवन येथे मंगळवारी सकाळी 9 वाजता स्वतः आंदोलन करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.

या महिन्याच्या प्रारंभी उन्हाची तीव्रता आणि तीव्र पाणी टंचाई अशा कात्रीत सापडलेल्या दक्षिण विधानसभा मतदार संघातील शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक झाला, त्यातून त्यांच्या आंदोलनाचा जन्म झाला होता.  त्यावेळी आपण अधीक्षक अभियंत्यांना पाणी सूचना केल्या होत्या. त्यांनी 12 मे रोजी पाणी सोडणार असल्याचे लेखी दिले होते.

त्या अनुषंगाने आज पाणी सोडणे अपेक्षित होते, परंतु अद्यापपर्यंत सोडले नाही. त्यामुळे आपण मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून सिंचन भवन कार्यालयासमोर नदीकाठच्या शेतकर्‍यांसह धरणे आंदोलनास बसणार असल्याचं आ. देशमुख यांनी म्हटलं आहे.