सोलापूर : भारत देश हा सध्या युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अशा संकटसमयी सर्वांनी देशाबरोबर राहणं हे खूप महत्वाचे आहे. याप्रसंगी देश हितासाठी जो निर्णय घेतला असेल तो सर्वांनी आनंदाने स्वीकारून त्या निर्णयाबरोबर राहिले पाहिजे. देश सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित राहू शकतो. राष्ट्रहित हेच स्वहित असल्यामुळे भाविक वारकरी मंडळ, पदाधिकाऱ्यांनी युद्ध परिस्थितीमध्ये सर्व कीर्तनकारांनी देशाबरोबर राहावं असं आवाहन ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी केलं आहे.
सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज यांनी आपापल्या कीर्तनातून सध्यस्थिती व देशप्रेम या विषयी दररोज जागृती करावी, तसे प्रबोधन करावे, कारण समाज मनातील श्रद्धा देशाकडे आणणे खूप गरजेचे आहे.
"धर्माचे पालन | करणे पाखांड खंडण ||" या न्यायाने धर्म, देश सांभाळून जागर आवश्यक आहे, असं ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज यांनी म्हटलं आहे.
कीर्तन हे प्रबोधनाचे सर्वात प्रभावी माध्यम वा साधन आहे. देशासाठी त्याचा उपयोग करणे काळाची गरज आहे. महाराज व कीर्तनकार यांचेवर भाविकांचा असलेला विश्वास देश प्रेमामध्ये परिवर्तीत करावयाचा आहे. या माध्यमातून तरी अल्पसी देशसेवा करता येणार असल्याचे समाधान सुधाकर इंगळे महाराज यांनी ऑनलाईनने घेतलेल्या मंडळाच्या बैठकीत व्यक्त केले.
शिवरायांच्या काळात स्वराज्य प्रेम व जागृती करताना कीर्तन हे माध्यम उपयोगी आले होते. सैनिक आपली जबाबदारी खूप चांगली पार पाडत आहेत. आपण ही याप्रसंगी देशांतर्गत स्थिती शांत राहावी, यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. युद्ध परिस्थिती मध्ये देशातील नागरिक व सर्वांची मानसिकता स्थिर कराणे. अशा बिकट प्रसंगी आपण ही सर्वांनी देशहित जोपसलं पाहिजे.
हा निर्णय सर्वांनी स्वीकारून कीर्तन व प्रवचन यातून जागृती सुरु केली आहे. महाराष्ट्र प्रत्येक जिल्हाध्यक्ष आपापल्या जिल्ह्यामध्ये बैठक घेऊन या विषयी नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे भाविक वारकरी मंडळाने एक पत्रक काढून जाहीर केलं आहे.