Type Here to Get Search Results !

मारकडवाडीनंतर आता गादेगावकरांचा उठाव; डमी इव्हिएम ला सलाईन लावून प्रतिकात्मक आंदोलन


सोलापूर : "लोकांनी केलेले मतदान नेमके त्याच उमेदवाराला जाते की, आणखी दुसर्‍या कोणाला जाते, हे प्रश्न जर लोकांच्या मनामध्ये उपस्थित होत असेल तर हे लोकशाहीसाठी घातक आहे, मशिन्सबाबत सामान्य जनतेत तीव्र नाराजी दिसून येते, मारकडवाडी हे एक उदाहरण असल्याची भावना संभाजी ब्रिगेडचे तालुकाप्रमुख बाळासाहेब बागल यांनी व्यक्त केलीय.

मंगळवारी, ०३ डिसेंबर रोजी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर गावात फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाने हस्तक्षेप करून व गुन्हे दाखल करण्याचा दबाव टाकल्यानंतर गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार जरूर घेतली, मात्र प्रशासनाने केलेल्या दबावामुळे राज्यभर याची चर्चा झाली. आता याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इव्हिएमद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत लोकांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. बर्‍याच लोकांमध्ये इव्हिएम बाबत शंका व्यक्त होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात अनेक ठिकाणी मतमोजणी व झालेले मतदान यांमध्ये आढळलेली तफावत आणि त्यांनी काही ठिकाणी आकडेवारीमध्ये झालेला घोळ यामुळे आता अनेक ठिकाणी या इव्हिएम मशीन्सविरोधात आवाज उठवला जात आहे.

याचाच भाग म्हणून बुधवारी पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथिल काही गावकऱ्यांनी व मतदारांनी एकत्र येत डमी इव्हिएम मशीन ला सलाईन लावत एकप्रकारे प्रतिकात्मक आंदोलन केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल बोलत होते.

यासंदर्भात बोलताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सडेतोड वक्ते रणजित बागल म्हणाले, इव्हिएम मशीन्सबाबत सामान्य जनतेमध्ये अनेक शंका आहेत. या मशीन्सद्वारे येणारे निकालाचा जनतेला भरवसा उरलेला नाही, शिवाय राज्यात ठिकठिकाणी या मतदान प्रकियेतील आकडेवारीतील चुकीच्या आकडेमोडीमुळे तर जनता आणखी संभ्रमात आहे, मशीन ही शेवटी मशीन्स असतात, त्याला मानव कशावरून ऑपरेट करू शकणार नाही, जनतेने दिलेले मत त्याच उमेदवाराला जाते की नाही, याबाबत जनतेला संशय निर्माण झाला आहे, या मशीन्स जर जनतेच्या निरसन करू शकत नसतील, तर अशा मशीन्सलाच उपचाराची गरज आहे, म्हणून हे प्रतिकात्मक आंदोलन आम्ही सर्वजण करत आहोत" असंही रणजित बागल यांनी म्हटले.

यावेळी बोलताना शेतकरी नेते समाधान फाटे यांनी देखील इव्हिएमबाबत शंका उपस्थित करताना सामान्य जनतेला आता इव्हिएम मशीन्ससंबंधी विश्वास उरलेला नाही, मतदारांच्या शंकेला आकडेवारीतील घोळामुळे आणि झालेल्या अनाकलनीय निकालामुळे निश्चित बळ मिळालं आहे, लोकं स्पष्टपणे इव्हिएमविरोधात बोलत आहेत, मात्र न्यायव्यवस्था मात्र याबाबत शाश्वत तोडगा काढायला तयार नाही, त्यामुळेच आता जनता देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे."

महाराष्ट्रात अशी असंख्य गावे आहेत, जी फेर मतदान व मतमोजणीस उत्सुक आहेत, लोकांच्या मनातील संशय वाढवणाऱ्या घटना इव्हीएमच्या माध्यमातून घडल्या असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळेच जनतेचा निवडणुक आयोग व मतदान प्रक्रियेवर विश्वास उरलेला नाही, म्हणून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. येत्या काळात आम्ही याबाबत लढत राहु"अशी प्रतिक्रिया बागल यांनी यावेळी बोलताना दिली.

इव्हिएम विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला.यावेळी गावकरी व युवक देखील उपस्थित होते.