सोलापूर : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेअंतर्गत कार्यरत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यभर परिवार सर्वेक्षण अभियान राबविण्यात येणार आहे.
हे सर्वेक्षण बुधवारी, ८ ते २५ एप्रिल २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार कालावधी वाढविण्यात येऊ शकतो.
अमृत संस्थेच्या लक्षित गटामध्ये सध्या ब्राह्मण, सिंधी, गुजराती, पटेल, राजपूत, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, जाट, वैश्य इत्यादी सुमारे २५ जातींचा समावेश असून, सर्वेक्षणानंतर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास औद्योगिक व प्रगत कौशल्य विकास रोजगाराभिमुख प्रशिक्षण उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक आर्थिक सहाय्य स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन उद्योग व्यवसायासाठी व्याज परतावा योजना या प्रमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणाचा उद्देश लक्षित गटातील कुटुंबांची अचूक संख्या निश्चित करणे, त्यांच्या गरजा व अपेक्षा जाणून घेणे, तसेच स्थानिक संसाधने, कौशल्ये व आवडीनुसार नव्या योजनांची आखणी करणे हा आहे.
या अभियानाद्वारे अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचविणे, तसेच नागरिकांकडून अभिप्राय घेऊन भविष्यात अधिक परिणामकारक योजना राबविण्याचा मानस आहे.
या कालावधीत अमृत संस्थेचे प्रतिनिधी लक्षित गटातील कुटुंबे, संस्था, संघटना व मंडळांशी संपर्क साधणार आहेत. तसेच संबंधितांनी स्वयंस्फूर्तीने जिल्हा व विभागीय कार्यालयांशी संपर्क साधून आपल्या कुटुंबाची किंवा संस्थेची माहिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
तरी लक्षित गटातील जास्तीत-जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) विजय जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000