Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीना 14 मे पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सोलापूर : राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025-26 अंतर्गत सोयाबीन पीकासाठी सोलापूर जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मुल्य साखळी भागीदार (VCP) यांचे मार्फत संपुर्ण जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात समुहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा इ. घटक राबवायचे आहेत. याकरीता खालील निकष पूर्ण करणारे शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था यांची निवड करावयाची आहे.

मुल्य साखळी भागीदार (VCP) म्हणून निवड करावयाच्या शेतकरी उत्पादक कंपनीकरीता पुढील प्रमाणे पात्रता निकष असणार आहेत. यामध्ये कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली असावी. ज्या जिल्ह्यात समुह तयार झाला आहे, तेथे काम करण्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा, म्हणजेच नोंदणी माहे मार्च, 2022 पूर्वीचा असावा. 

किमान 200 शेतकरी, उत्पादक कंपनीमध्ये किंवा सहकारी संस्थेमध्ये नोदंणीकृत असावेत. सहकारी संस्था असल्यास संस्थेच्या उद्यिष्टामध्ये तेलबिया पिकांत कामकाजाबाबत नमुद असावे. मागील 3 वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल 9 लाख रूपयापेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान 3 लाख रूपयांचा सहभाग असावा. शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यामध्ये कार्यरत असावी. 

सरकारकडून अनुदान प्राप्त कर्त्या शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाणार आहे. रू. 10,000 शेतकरी उत्पादक संघ योजनेअंतर्गत तयार केलेले शेतकरी उत्पादक कंपनी, NAFED NSC-OS इत्यादी सार्वजनिक संस्थाकडे नोंदणीकृत तेलबियाशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी यांना वरील पात्रता निकषाच्या पुर्ततेच्या अधीन राहून प्राधान्य दिले जाणार आहे.

या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधीन राहून वरील निकषांचे पुर्तता करणारे इच्छूक शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी संस्था यांनी सोयाबीन पिकासाठी दि. 14 मे, 2025 पर्यत वरील निकषाच्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाकडे कंपनीच्या लेटर हेडवर संचालक मंडळाच्या ठरावासह अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकर शुक्राचार्य भोसले यांनी केलं आहे.