सोलापूर : तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथील उपपिठाहून नाणिजधाम रत्नागिरी येथे निघालेल्या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत शिंगोली-तिऱ्हे हद्दीवर मोहोळ तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रभाकर शितोळे, सोलापूर जिल्हा निरीक्षक सचिन काकडे (पुणे) सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सविता परांडे, मोहोळ तालुका महिला अध्यक्ष वैशाली बंडगर, उत्तर सोलापूर तालुका महिला अध्यक्ष विद्या शेंडगे, तेलंगणा पीठ प्रोटोकॉल अधिकारी दीपक देशमुख, मोहोळ तालुका अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, दत्तात्रेय शेंडगे, बंडू शितोळे, राजू कोळेकर, सुमित्रा जगदाळे, वर्षा सपकाळे व मोहोळ तालुका सेवा समिती सर्व पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिंगोली येथे कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. वसुंधराची आपण मोठ्या प्रमाणात हानी करत आहोत, वृक्षतोड करत आहोत. त्यामुळे भविष्यामध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागेल, असे कोणतेही संकट वाढवू नये, म्हणून नानिज्धाम जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्यावतीने पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. 
प्रत्येक विसावा आणि मुक्कामाच्या ठिकाणी या दिंडीतील सदस्यांच्या मार्फत वृक्ष लागवड केली जाते आणि ते वृक्ष जोपासण्याची हमीही घेतली जाते, अशी माहिती प्रभाकर शितोळे यांनी दिली.
२७, सप्टेंबर रोजी तेलंगणा येथील श्रीक्षेत्र उपपीठ तेलंगणा, कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे वसलेल्या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्थापित रामानंद संप्रदाय, तेलंगणा उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान २७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेले आहे. या पायी दिंडी मध्ये हजारो भाविक तेलंगणा पासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत. 
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा येत्या २१ ऑक्टोबर रोजी ५९ वा वाढदिवस येत आहे. रामानंद संप्रदायाचे मुख्यपीठ नाणीजधाम येथे हा उत्सव या दिवशी अनेक वर्ष साजरा केला जातो. त्यादिवशी ही दिंडी नाणीजधाम येथे दाखल होणार आहे.
तेलंगणा उपपीठ सोबतच पूर्व विदर्भ, उत्तर महाराष्ट्र (नाशिक) उपपीठ, मराठवाडा (परभणी) उपपीठ, मुंबई उपपीठ (वसई), पश्चिम महाराष्ट्र (पुणे) व गोवा या ७ उपपिठाहून देखील अशाच प्रकारे पायी दिंड्या निघणार आहेत. या दिंडीला 'वसुंधरा पायी दिंडी' असं नाव देण्यात आलं आहे.
या दिंडीतून, सध्या अत्यंत जिकरीच्या पण तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर प्रकाश टाकला जात आहे. यावर केवळ संदेशच न देता त्यांच्या कृतीतूनही संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
हजारो लोकांची खाण्या-पिण्याची, राहण्याची, मलमूत्र विसर्जनाची, अंघोळीची सोय करताना पर्यावरणाला काहीही हानी होणार नाही, याची काळजी आयोजकांकडून घेतली जात आहे. 
दिंडी पुढे जाताना मागे कचरा होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी विशेष सेवेकरींचे पथक या दिंडीत सामील आहे. सोबत टॉयलेट व्हॅन देखील तैनात आहे, तसेच सोबत पिण्याचे पाणी, आणि स्वच्छतेसाठी लागणारे पाणी घेऊन २ स्वतंत्र टँकर्स देखील दिंडी सोबत कायम सज्ज आहेत. त्याचसोबत या दिंडीच्या माध्यमातून दरदिवशी वृक्षारोपण देखील केले जात आहे.
विशेष म्हणजे हि दिंडी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रस्त्याच्या एका बाजूने, एका रांगेत, एका तालात आणि लयीत, त्यांच्या सांप्रदायिक गजरावर चालत पुढे सरकत आहे. त्यांच्या वेशभूषा सुद्धा एका रंगसंगती मध्येच आहेत. एका तालावर चालताना वर्दळीच्या भागात ही दिंडी ग्लोबल वॉर्मिंगवर संदेश देताना आढळून आली. 
अशाप्रकारे वसुंधरा पायी दिंडीचे हे सलग तिसरे वर्ष आहे आणि तेही नवीन २ दिडींसह, जी एक वाखाणण्याजोगी बाब आहे. यातून संस्थानाचा एक चांगला उपक्रमच नाही तर त्यांचे सातत्य आणि चिकाटी ही दिसून येते.
या दिंडीमध्ये सहभागी भाविकांची सुद्धा विशेष काळजी घेतली जात आहे असे आढळून आले, कारण वेळच्या वेळी सकस आहार पुरवला जात आहे. त्यासोबत दिंडीमध्ये संस्थानाची एक ऍम्ब्युलन्स चालताना आढळून आली. ज्यात एक वैद्यकीय पथकही सेवा देताना दिसून आले आहे.
अशी ही आगळीवेगळी पायी दिंडी ज्यात फक्त मध्यमवयीनच नाही, तर युवा-युवती, महिला-पुरुष असे सर्व वयोगटाचे आणि सर्व सामाजिक वर्गातले भाविक दिसून आले.
