एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी शुद्ध पाण्याचा नितळ उपक्रम,
कै. रामचंद्र विठोबा आवताडे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
मंगळवेढा : “सरकारी नोकरी करतानाही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना फार थोड्यांत दिसते. अंकुश अवताडे यांनी ही भावना कृतीतून साकारली आहे.” असे गौरवोद्गार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी काढले.
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगांव येथील ‘कै. रामचंद्र विठोबा अवताडे बहुद्देशीय सामाजिक संस्था’ ही एसटी कर्मचाऱ्यांसाठी शुद्ध पाण्याच्या माध्यमातून सेवा पुरवत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे कार्य तासन्तास उन्हात, पावसात सुरू असते. त्यांच्या या मेहनतीच्या जीवनशैलीत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची गरज
अधिक तीव्र असते. याच गरजेतून राज्य परिवहन विभागाच्या सोलापूर विभागीय कार्यालयात आज मंगळवेढा, पंढरपूर नंतर तिसऱ्या RO वॉटर प्लांटचे उद्घाटन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, नगरचे उपजिल्हाधिकारी अनुप यादव, उद्योजक जयदीप रत्नपारखी, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार, उद्योजक व CA धीरज जवळकर, माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह संस्थेच्या अध्यक्षा सपना अवताडे, उपाध्यक्ष शिवदास जाधव, खजिनदार ब्रम्हदेव माने, सचिव दत्ता स्वामी, सदस्य लहू अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भाग्यश्री जाधव यांनी या उपक्रमाचं मुक्तकंठाने कौतुक केले.
एस.टी. चे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी देखील कर्मचाऱ्यांसाठी पाण्याची सोय केल्याबद्दल आभार मानत अक्कलकोट येथेही असाच प्लांट बसवण्याची मागणी केली, ज्याला कै. रामचंद्र विठोबा अवताडे बहुद्देशीय सामाजिक संस्थेने तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला.
“कै. रामचंद्र विठोबा अवताडे हे एस.टी. विभागात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात सामाजिक जाणीव ठेवत काही उपक्रम करण्याचा मानस होता. त्यातूनच पाण्याची सेवा देण्याचा मनात विचार आला. आतापर्यंत संस्थेच्या वतीने तीन वॉटर प्लांट बसवण्यात आलेत. बसवण्यात आलेले तीन RO वॉटर प्लांट दर तासाला 1 हजार लिटर पाणी प्रक्रिया करतात, आणि ते सातत्याने कसे कार्यरत राहतील, याची पण दक्षता संस्थेकडून घेतली जात आहे. एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही सुविधा त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणारी बनली आहे.’’ असे मत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपनिरीक्षक अंकुश अवताडे यांनी व्यक्त केले. 
या कार्यक्रमाला राज्य परिवहन विभागाचे कर्मचारी, आंधळगावचे ग्रामस्थ आणि कै. रामचंद्र विठोबा अवताडे बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिमराव घुले यांनी यांनी केले. तर आभार आणि सूत्रसंचालन मंगेश लामकाने यांनी केले.
शासकीय सेवा ही केवळ नोकरी नसते, ती असते समाजासाठीची एक बांधिलकी. हीच सामाजिक जाणीव मनात ठेवत कै. रामचंद्र विठोबा अवताडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू झालेला शुद्ध पाण्याचा नितळ उपक्रम आज अनेकांना प्रेरणादायी ठरतोय.
