सोलापूर :
राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या बार्शी तालुक्यातील मळेगांव सुपुत्र शिवाजीराव पवार यांची अटल भूजल योजनेच्या राज्य प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली. या निवडीच्या माध्यमातून भूजल साठा वाढवण्यासाठी चार दिवसाच्या राज्यस्तरीय पाणी व भूजल व्यवस्थापन या विषयावरील राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी पंचायतराज प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने राज्य प्रशिक्षक म्हणून यशदा पुणे येथे निवड करण्यात आली.
राज्यातील ११३३ गावांमध्ये मार्गदर्शन करण्याची त्यांची तज्ञ प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. निवडीमुळे संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं कौतुक होत आहे.
मळेगांवचे माजी सरपंच गुणवंत मुंडे, मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब माळी, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर श्रीखंडे, पोलीस पाटील ज्ञानेश्वर माळी, गावच्या सरपंच सौ. ज्योती माळी, उपसरपंच धीरज वाघ,मेजर हरिश्चंद्र नलवडे, संतोष निंबाळकर यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा दिल्या.
जलयुक्त शिवार अभियानाचा राज्यामध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे आता खऱ्या अर्थाने मळेगांव चा आदर्श कमी पाण्याची गावे घेतील आणि भूजल साठा वाढवणे, वेगवेगळे उपचार करणे आणि पाण्याची गुणवत्ता सुधारणे या कामी प्रयत्न केले जातील, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये केलेल्या उत्तम कामामुळे मळेगांव परिसरातील सर्व गावाची पाणी पातळी वाढली, या योजनेचा फायदा मळेगांवला झाला आहे. अशाच पद्धतीचा फायदा इतर राज्यातली अवर्षणग्रस्त गावांनी घ्यावा, याकरिता इथून पुढे प्रयत्न केले जातील, असेही प्रशिक्षक शिवाजीराव पवार यांनी सांगितले.