सोलापूर : आधुनिक कृषि तंत्रज्ञान आणि खरीप हंगाम पूर्व नियजण प्रसारासाठी विकसित कृषी संकल्प अभियान २९ मे ते १२ जून २०२५ या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये पोहोचवण्याचे काम महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, राष्ट्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर यांच्यामार्फत केले जाणार आहे.
आज माढा तालुक्यातील अंजनगाव येथे कार्यक्रमास आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान उपस्थित वैजनाथ दिगंबर चौगुले यांच्या डाळिंब बागेत भेट देऊन पाहणी केली. दरम्यान डाळिंब बागेमध्ये मर व तेल्या रोगाचे ओळखणी करून एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर च्या डॉ. शिल्पा परशुराम यांनी केले.
केंद्रीय भरड धान्य संशोधन संस्था, सोलापूर वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. परशुराम पात्रोटी यांनी भरड धान्याचे पौष्टिक तत्त्वे, विकसित वाण, बियाण्यांची उपलब्धता, लागवड तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. कृषि विज्ञान केंद्र मोहोळचे दिनेश क्षिरसागर विषय विशेषज्ञ (अन्नशास्त्र व तंत्रज्ञान) यांनी कृषि मालाचे मूल्यवर्धन, फळे व भाजीपाला निर्जलीकरण उद्योग, कडधान्य प्रक्रिया, आणि प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना याविषयी सविस्तर माहिती दिली.
विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. पंकज मडावी यांनी खरीप हंगामातील कीड व रोग व्यवस्थापन, AI आधारित फेरोमॅन ट्रॅप्स, अशा विविध नवीन तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.
विषय विशेषज्ञ, (मृद विज्ञान व कृषि रसायन शास्त्रं) श्रीमती काजल जाधव म्हात्रे यांनी माती व पाणी परीक्षण आधारित खत व्यवस्थापन याबद्दल उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.
याप्रसंगी अंजनगाव चे सरपंच प्रदीप चौगुले, उप कृषि अधिकारी संदीप ढोले, सहायक कृषि अधिकारी घोडके हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुयोग ठाकरे यांचे सहकार्य लाभले.